प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढें वैखरी राम आधीं वदावा ।।
सदाचार हा थोर सांडूं नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ।।३।।
भक्तिमार्गाला लावावें म्हणजे काय करावें त्या संदर्भात हाहि श्लोक विचार करण्यासारखा आहे. वरवर दिसावयास अगदी व्यावहारिक आणि तांत्रिक उपाय समर्थ सांगत आहेत. तसें म्हटलें तर कोणालाहि साधाव्या, आचरणांत आणण्यास सोप्या जाव्या आणि निष्ठेनें करीत राहिल्या तर अधिकाधिक प्रगतीस सहाय्यक व्हाव्या अशा गोष्टी सांगणें हें समर्थांचें एक वैशिष्ट्य आहे.
सकाळीं उठून प्रथम मनांतल्या मनांत रामाचें चिंतन करावें असा आदेश समर्थांनीं दिला आहे. या आदेशानें एक प्रकारें झोपलेल्याला जाग आणली आहे. जागे होतांच काय करावें वा जागे होणें कशाला म्हणतात तें सांगितलें आहे. प्रभात शब्दानें एक विशिष्ट काळ सुचविला जातो. सूर्योदयापूर्वीच्या २-३ घटका म्हणजे प्रभातकाळ. सामान्यत: ४।। पासून ६-६।। पर्यंतचा काळ प्रभातकाळ म्हणता येईल. आरोग्यासाठी आणि चिंतनासाठीं जागे होण्याच्या दृष्टीनें ही वेळ उत्तम आहे. रात्रीं ९।।-१० वाजतां झोंपणार्या माणसाला ६-७ तास झोप झाल्यानंतर यावेळीं चांगली जाग येते. आयुर्वेदानें हा काळ वाताचा सांगितला आहे. मलशुद्धीच्या दृष्टीनेंहि यावेळीं जागे होणें अधिक उपयुक्त ठरतें. शौचमुखमार्जन उरकलें म्हणजे शरीर स्वच्छ, हलकें, उत्साही राहतें व ही वेळ मननचिंतनास अधिक चांगली. वातावरणहि शांत, प्रसन्न, सुखशीतल असें असतें. बुद्धि सतेज आणि मन उत्साही असतें. यावेळीं केलेल्या नामस्मरणाचा परिणाम शरीर-मन- बुद्धीवर चांगला हितकर असाच होतो. मृगाजिनावर, लोकरीच्या आसनावर वा टणक अशा स्वत:च्या अंथरूणावरहि साधी मांडी घालून, शक्यतो ताठ बसावे. तोंड पूर्वेकडे वा उत्तरेकडे असावे. हात नाभीच्या खाली अर्धांजली करून एकमेकांवर ठेवावेत किंवा ज्ञानमुद्रा करून दोन्हीं गुडघ्यांवर ठेवावेत. आणि मग मनातल्या मनांत इष्ट देवतेचें नामस्मरण करावें.
हें नामस्मरण वैखरी वाणीच्या आधीं ज्या मध्यमा पश्यंति आणि परा अशा वाणी शास्त्रकारांनीं सांगितलेल्या आहेत त्याद्वारां करावें. परेच्याद्वारां नामस्मरण घडणें ही गोष्ट सर्वसामान्यांच्या दृष्टीनें फार अवघड अशी आहे. एखाद्याच महात्म्याला हें साधेल, साधलेलें असेल. एकाग्रता पूर्ण होऊन ती ध्यानाच्या पातळीवर चढली, बुद्धि स्थिरावली, मन चंचलता टाकून निर्वासन झालें, म्हणजेच परा वाणी कार्यक्षम होऊं शकते. दीर्घकालीन सातत्य, शरीरमनाची शुद्धता आणि उत्कट प्रयत्न याविनां हें साधणारें नव्हें. आरंभीं आरंभीं तरी या नादाला न लागणेंच श्रेयस्कर. थोडावेळ मानसिक नामस्मरण करून इतर उद्योगाला लागण्यापूर्वी कांहीं वेळ वैखरी वाणीनेंहि नामाचा उच्चार करावा. आपल्या जुन्या परंपरेंत पहाटेंच्या वेळीं निरनिराळीं प्रात:स्मरण स्तोत्रें वा भूपाळ्या म्हणायची पद्धति आहे. गेल्या पिढीपर्यंत हे वळण समाजामध्ये सार्वत्रिक होतें. अगदीं तमासगिरांनींसुद्धा भूपाळ्यांची रचना केलेली आहे. वर्तमानकाळीं मात्र हे सर्व नव्यानें सांगण्याचा प्रसंग आलेला आहे. तरुण पिढीमध्ये हा आचार जवळजवळ राहिलेला नाहीं. उलट बुद्धिवादाच्या नांवाखालीं यांत काय अर्थ आहे? हें कशाला? याचा काय उपयोग? असें प्रश्न विचारून, टिकून राहिलेले अनेक चांगले आचारहि जीवनाला पारखे होतील अशी परिस्थिति निर्माण केलेली आहे. जुन्या गोष्टी मोडून काढल्या पण त्या जागीं नवीन चांगले आचार मात्र रूढ केले नाहींत. त्यामुळें एक तर्हेची पोकळी निर्माण झाली. नैराश्य वाढलें.
फॅशनच्या नांवाखाली नवीन पिढीमधें घुसलेल्या अनेक गोष्टींची तरी उपयुक्तता सिद्ध करण्यासारखी आहे काय? पण हा प्रश्न विचारण्याची सोय मात्र राहिलेली नाही. आपल्या परंपरेंत "संदिग्धे परलोकेऽपि त्याज्यमेवाशुभं जनै: । नास्ति चेत् नास्ति का हानि: अस्ति चेत् नास्तिको हत: ।।" असें सांगितलें आहे. हें व्यावहारिकदृष्ट्या फार महत्त्वाचे आहे. ईश्वर आहे कीं नाहीं? नामस्मरणांत वेळ घालवावा कीं नाहीं? त्यामुळें कोणता लाभ होतो? याचा निर्णय झाला नाहीं तरी सकाळच्या वेळांतील १०-१५ मिनिटें नामस्मरणांत घालविलीं तर असा कोणता विशेष तोटा होणार आहे? माझ्या अल्प बुद्धिला वाटते त्याप्रमाणें खरोखरीच समजा परमेश्वर नसला तर नामस्मरणांत घालविलेली १०-१५ मिनिटें वाया जातील. असा कितीतरी वेळ वाया जातो हें आपणांस माहीत आहेच. पण ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांच्यासारखे थोर थोर महात्मे, विचारवंत पुरुष सांगतात त्याप्रमाणें परमेश्वर खरोखरींच असेल तर त्याच्याकरितां मी १०-१५ मिनिटेंहि देऊं शकत नसेन तर मी माझ्या अध्यात्मिक लाभाच्या दृष्टीने केवढी तरी हानि करून घेतली असेंच होणार नाहीं काय? यासाठी नामस्मरणानें झाला तर लाभच होईल. तोटा कांहींच नाही असा विचार करून नामस्मरण करावें. यालाच `टु अर ऑन द सेफर साईड' असें म्हणतात.
थोड्या निराळ्या प्रकारचा माझा एक अनुभव या संदर्भात सांगतों. उन्हाळ्यांत लोणावळ्यास राहणें होत असतांना मी कामासाठी रोज लोणावळ्याहून पुण्यास येत असे. सकाळीं १०-१०।। वाजतां गाडी असायची व ११।।-१२ वाजतां मी पुण्यास पोंचायचो. महाविद्यालयांत जाऊन काम करून पुन्हा संध्याकाळीं परतायचे. सकाळी जातांना जेवून जावयाचे. ती. दादा मला रोज शिदोरी घेऊन जाण्यास भाग पाडावयाचे. मी म्हणत असे हा प्रवास रोजचा आहे. १।। तासांत संपतो. मी जेवून जातों. तेव्हां रोज शिदोरी बरोबर कशाला? दादा म्हणत `हमाल करावा लागेल इतकें त्याचें ओझें तुला होतें कां? प्रवासांत कांहीतरी शिदोरी बरोबर पाहिजे अशी आपली पद्धत आहे. शास्त्रांत कुठे वचन आहे कीं नाहीं तें तुझें तूं शोधून काढ.' ते मला रोज आठवणीनें शिदोरी घेण्यास लावीत. एकदां वाटेंत गाडीचें कांहींतरी बिघडलें आणि ती मध्येंच कुठेतरी थांबली. ४-५ तास खोळंबून राहावें लागलें आणि मग ज्यांच्याजवळ कांहीं नव्हते त्यांचे किती हाल झाले ते विचारूं नका. शिदोरी बाळगण्याचा नियम असल्यामुळें मी व माझ्या बरोबर एक प्रवासी लहान मूल सुखरूप राहिलों. नामस्मरणांत घालविलेला वेळ अनावश्यक वाटला तरी असाच उपयुक्त ठरणें शक्य आहे.
आज आपण ज्या तर्हेचें जीवन जगत आहोंत त्यांत शरीर-मन-बुद्धीवर अनेक प्रकारचे ताण सतत पडत असतात. या वाढत्या ताणांमुळेंच अपचन, मलावष्टंभ, आम्लपित्त, निद्रानाश, रक्तदाब, मधुमेह, हृद्रोग यासारख्या लहान मोठ्या विकारांचे प्रमाण बरेंच वाढलें आहे. या ताणांचे दुष्परिणाम नाहींसे करण्याच्या दृष्टीनेंहि पहाटेच्या प्रसन्न वेळी शांतपणे केलेल्या नामस्मरणाचा पुष्कळ उपयोग होण्यासारखा आहे. अगदीं यांत्रिक पद्धतीनें केलेल्या नामस्मरणादि कृतींचाहि कांहीं लाभ आहेच. भावानें, श्रद्धेनें, निष्ठेनें केले तर अधिकस्य अधिकं फलम् प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नुसते पहाटें तेवढें नाम घ्यावें असें नसून दिवसभरहि त्याचें यथाशक्ति स्मरण वा उच्चारण करीत असावें, म्हणजे त्याचा परिणाम मध्यमेंतील व पश्यंतींतील उच्चारणावरहि होतो. एकांतीं तर घ्यावेंच पण लोकांतीहि घ्यावे. यासाठींच "अहो येतां जातां उठत-बसतां काम करितां" या श्लोकाने "समस्तांची लज्जा त्यजुनि भगवत्चिंतन" करण्यास सांगितलें आहे.
पुरेसा अभ्यास नसेल, जीवन शुद्ध, सात्त्विक, पवित्र नसेल, तर मनांतल्या मनांत नाम घेण्याचाहि ताण येतो. म्हणून नाम मोठ्याने घ्यावे. यासाठीच "अती आदरें गद्य घोषें म्हणावें" असें सांगितलें आहे. कांहीं कांहीं वेळ टाळमृदंगाच्या घोषांतहि घ्यावें. यांतील जें शक्य आहे तें, शक्य तितकें अधिक वेळ, नियमानें, आदरानें, प्रेमानें, निष्ठेनें करावे.
हें नामस्मरणासंबंधीं सांगितलें. आतां एरवींचें वर्तन कसें असावें तेंहि समर्थ सांगतात, "जेणें विठ्ठलमात्रा घ्यावी । तेणें पथ्यें सांभाळावीं ।" असे संतवचन प्रसिद्ध आहे. नामस्मरण वा पूजाअर्चादि कोणतेंहि धार्मिक कृत्य हें त्याच्या जोडीनें आचार-विचारांतील पवित्रता चढत्या-वाढत्या क्रमानें स्वीकारल्यावांचून फलद्रूप होत नाहीं हें निश्चित समजावें. म्हणून पहिल्या दोन ओळींत नामस्मरण करावें असे सांगितल्यानंतर पुढच्या तिसर्या ओळींत समर्थ सद्वर्तनी असावें, सदाचाराचा त्याग करूं नये असें सांगत आहेत. सदाचार हाच थोर आहे. म्हणजे श्रेष्ठ, वंदनीय, आदरणीय स्वीकार्य आहे. तो आचरणांत आणलाच पाहिजे. त्याचा त्याग होतां कामा नये. आतां हा सदाचार म्हणजे तरी काय? या शब्दाचे अर्थ दोन रीतीने करतां येतील. सतां आचार: · सदाचार: सज्जनांची जी वागण्याची पद्धत तिलाच सदाचार असें म्हणावे किंवा सत् आचार · सदाचार: सत्य असा जो आचार, सत्यावर अधिष्ठित अशी जी वागण्याची पद्धति तीहि सदाचारच होय. यांतील सत्याचें आचरण करण्यास वा वागणूक सत्याधिष्ठित ठेवण्यास सत्य म्हणजे काय तें कळलें पाहिजे. हें इतकें सोपें नाही. विचार करणाराच्या बुद्धींतले गुणदोष, वस्तुस्थितीला झांकून, जें जसें आहे त्यापेक्षां उण्याअधिक प्रमाणांत वेगळेंच दर्शन घडवितात. एकाच घटनेचें वर्णन निरनिराळी माणसें किती निरनिराळ्या प्रकारांनी करतात तें पाहिलें म्हणजे हें लक्षांत येईल. म्हणून सत्य काय तें यथार्थरीतीनें जाणून घेणें नेहमींच अवघड ठरतें. सत्याच्या ज्ञानासाठीं बुद्धि अत्यंत निर्मळ, पूर्वग्रहरहित, तीक्ष्ण आणि निश्चल असली
पाहिजे. लाकडें मोजण्याचा तराजू, जरी तराजूच असला तरी सोनें मोजण्यासाठीं वा प्रयोगशाळेतील महत्त्वाच्या रसायनांचें माप घेण्यासाठीं तो उपयोगी पडत नाहीं. तसेच नेहमीचे व्यवहार चांगलेपणानें करणारी बुद्धिहि कसोटीस उतरणार्या सत्याचें ज्ञान करून घेण्यास असमर्थ ठरते. सत्याच्या ज्ञानासाठी बुद्धीला सूक्ष्म संवेदनक्षमता असावी लागते. एका राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्यें रसायनें मोजण्याचा तराजू मी पाहिला तो मूळ वास्तूपेक्षां अधिक खोल पक्का पाया घेऊन तळापासून भरून आणलेल्या काँक्रीटच्या ओट्यावर कोनाडा करून बसविलेला होता. मोजणार्याच्या श्वासोच्छ्वासाचाहि परिणाम होऊं नये म्हणून कांचेच्या कपाटामध्यें तो सुरक्षित ठेवला होता. सत्यज्ञान करून घेणारी बुद्धि ही अशीच निर्लेप असावी लागते. इतकी सूक्ष्मता आपल्या बुद्धीला कोठून आणावयाची. संतांनीं हा तराजू उपलब्ध करून घेतलेला असतो. यासाठीं सत्याचा आचार हा जो सदाचाराचा अर्थ केला जातो तो आपल्या दृष्टीनें निरुपयोगी आहे. म्हणून व्यर्थहि आहे. जे खरेच मोठे आहेत त्यांचा आचार तो सदाचार. "महाजनो येन गत: स: पन्था: ।" सदाचाराचा हाच अर्थ आपल्या उपयोगाचा आहे.
माणसाचें मोठेपण ठरवितांना मात्र सावध राहिलें पाहिजे. थोडा विवेक केला तर हें मोठेपण समजून घेतां येईल. हा विवेक कठीण असला तरी सत्यशोधनासाठीं लागणार्या सूक्ष्मतेइतका दुर्लभ नाही. निवडून आला आहे, संपत्तिमान आहे, सत्ताधारी आहे, गोड बोलतो, चांगला विद्वान् वक्ता आहे, त्याच्या व्याख्यानाला सुशिक्षितांचीहि प्रचंड गर्दी जमते, यावरून माणसाचे मोठेपण ठरविणें योग्य नसतें. नि:स्वार्थता आणि कार्यक्षमता हे दोन गुण ज्याच्याजवळ जितक्या अधिक प्रमाणांत असतील तितक्या प्रमाणांत तो मोठा असें समजता येईल. एक थोर व्यक्ति दुसर्या थोर व्यक्तीपेक्षां निराळी असूं शकेल. पण तरीहि ती थोरच. गोखले आणि टिळक एकमेकापेक्षां वेगळे होते. त्यांचा विरोध प्रसिद्ध आहे. तरीहि ते थोरच होते. कार्याच्या दृष्टीनें त्यांनीं एकमेकांशीं झुंज घेतली असली तरी गोखल्यांची थोरवी टिळकांना मान्य होती. गोखल्यांच्यावरील मृत्युलेखांत टिळकांची ही भूमिका उत्तम रीतीनें व्यक्त झाली आहे. रानडे आणि टिळक, भांडारकर आणि टिळक यांचेहि असेंच होतें. दोघेहि टिळकांची योग्यता जाणून होते. विरोधक असूनहि मोठेपणा मान्य करण्याचें हें औदार्य सामान्य नव्हे.
एकाच्या दृष्टीनें शंकराचार्य मोठे ठरतील तर दुसर्याच्या दृष्टीनें मध्वाचार्य मोठे ठरतील. पण हा कोणाचेंच अनुकरण करीत नाही. यांतील खरा मोठा कोण ते ठरवा. मग कोणाप्रमाणें वागावयाचे तें पाहूं. तोंवर मी आपला नटाचेंच अनुकरण करतों असें म्हणून माणूस सदाचरणहि टाळीत असतो ही स्थिति चांगली नाहीं.
श्रेष्ठ व्यक्तींवर, थोर माणसावर श्रद्धा ठेवावी. आणि त्यांच्या आदेशाचें तंतोतंत पालन करावें हेंच चांगलें. मनांतून वाईट गेलें म्हणजे शरीरांतून जाईल हें कितीहि खरें असलें तरी थोड्याशा निग्रहानें शरीरांतून वाईट घालवण्याच्या प्रयत्नास लागल्यावांचून मनांतील वाईट उणावण्याचा संभव नाहीं हें लक्षात ठेवलें पाहिजे. रूढी आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत त्या यासाठींच. उंबर्यावर बसूं नये. उंबर्यावर शिंकू नये. उभ्यानें पाणी पिऊं नये. दक्षिणेकडे पाय करून झोपूं नये. या मागचीं कारणें कदाचित् सांगता येणार नाहींत. विज्ञानालासुद्धां `कां' चें (why चें) उत्तर देतां येत नाही. हे नियम कदाचित् जीवनाला एक प्रकारचें अनुशासन असावें, शिस्त असावी, प्रत्येक कृति जाणीवपूर्वक व्हावी म्हणूनहि असतील. पण आज स्वैरतेलाच स्वातंत्र्य मानलें जाते. आमच्या खाजगी जीवनात डोकावण्याचा तुम्हांला काय अधिकार आहे असा प्रश्न उद्दामपणें विचारला जातो. दुर्वर्तन लपवून ठेवावें आणि प्रतिष्ठा मिळवावी याचाच हा एक प्रयत्न आहे. चांगलें लिहिल्याबद्दल जर सत्कार घ्यावयाचा, तर वाईट लिहिण्याबद्दल खेटरें खाण्याचीहि तयारी का नसावी?
समर्थ सदाचरणी माणसाला धन्य म्हणतात ते यासाठी. निवडून येणे, मान, मान्यता मिळविणें, श्रीमंत होणें यात खरी धन्यता नाहीं. पापभीरू असणें, दुसर्याच्या धनाची अभिलाषा न धरणें, परस्त्रीकडे कामुक दृष्टीनें न पाहणें, शक्यतों दुसर्यास साह्य करणें, आपला स्वार्थ साधण्यासाठीं इतरांना पीडा न देणें, दुसर्याच्या अधिकारावर अतिक्रमण न करणें, दुसर्याची निंदा न करणें, स्वत:ची वृत्ति प्रसन्न राखणें हीं सदाचाराची लक्षणें आचरणांत आणण्यांतच खरी धन्यता आहे. असें ज्याचें जीवन असतें तोंच स्तुतीला पात्र झाला पाहिजे. म्हणून खाजगी जीवन हें स्वच्छ पाहिजे. कोणाचेंहि खाजगी जीवन पाहूं नये हें व्यवहारत: कितीहि खरें असलें तरी पाहण्यासारखें खाजगी जीवन नसणे हा जीवनाचा अध:पात आहे.