मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धि नको रे ।।
मना धर्मता नीति सोडूं नको हो ।
मना अंतरीं सार वीचार राहो ।।४।।
आपल्या मनांत येणार्या विचारतरंगांचें आपण कधीं विश्लेषण केलें आहे काय? विश्लेषण करूं गेले तर भय वाटेल असे विचार कितीतरी प्रमाणांत येत असतात. अगदीं नको त्या गोष्टी मनांत येत असतात. असे विचार मनांत येऊं नयेत म्हणून जो जो प्रयत्न करावा तो तो मन नाठाळ मुलासारखे हट्टीपणा करतें. लहान मुलांच्या खोड्या कौतुकानें पहात बसलें तर वाढतात. विरोध केला तर आणखीच उफाळून आल्यासारख्या होतात. `मन चिंती तें वैरी न चिंती' अशी म्हण आहे. तिची यथार्थता कोणालाहि पटावी अशीच वस्तुस्थिति असते. आपल्या अगदीं जवळच्या माणसाबद्दलहि अशा कल्पना मनांत येतात कींr जशा कट्टर शत्रूच्याहि मनांत येणार नाहींत. यासाठीच यजुर्वेदानें "तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु" अशी प्रार्थना कळकळीनें केली आहे. मनांत येणार्या वाईट विचारांचा वेग असा विलक्षण असतो कीं परमेश्वर कृपा करील तर त्यांतून सुटका होईल एरवी नाहीं. म्हणून "मदीय हृदयीं सदा शुभ विचार देवा स्फुरो" अशी भगवंताची प्रार्थना करावी लागते.
आपल्याकडे अशी धारणा आहे कीं, अशी श्रद्धा आहे कीं, आकाशांतून कांहीं देवता तथास्तु तथास्तु असें म्हणत गुप्तरूपानें फिरत असतात. आपल्या मनांत कांहींतरीं वाईट विचार यावा आणि देवतांनी तथास्तु म्हणण्यास गांठ पडावी असें होऊं नये. म्हणून वाईट गोष्टी मनांत आणूं नयेत, निदान वाईट बोलूं तरी नये. मनाला चांगलें वळण लावण्याचा प्रयत्न यासाठीं सतत करीत राहिले पाहिजे. मनांतहि वाईट न येणें हा सदाचरणाचा आदर्श आहे.
माणूस दुसर्याच्या दु:खानें दु:खी होतो असें पुष्कळ वेळां घडतें, पण माणूस दुसर्याच्या सुखानें सुखी होतो असें सहसा होत नाहीं. आपलें बरें न होतां दुसर्याचें बरें झालेलें पाहिलें तर त्याच्या मनांत पाप येतें. त्याचा अहंकार दुखावतो; ज्याचें बरें झालेलें दिसतें त्याची हा निंदा करतो. त्याचे दहा दोष दहा लोकांत सांगितल्यावांचून यास चैन पडत नाहीं. लग्नासारखा एकादा कौटुंबिक समारंभ चांगल्यारीतीनें पार पडला कीं मग त्यावर आप्तस्वकीयांकडून होणारी टीका-टिपणी ऐकण्याजोगी असते. शक्ति असती तर माणसानें दुसर्याचे वाईट करण्यास मुळींच मागें पाहिलें नसतें. पण अनेक कारणांनीं त्याच्या सामर्थ्याला मर्यादा पडल्यामुळे तो तें घातक कृत्य करू शकत नाहीं. बुद्धींत तर पाप येतेंच; पण तें पांडित्य निंदेच्या रूपानें प्रकट होतें. निंदा हें मत्सराचेंच अपत्य आहे. यासाठीं दुष्टवासना आणि पापबुद्धी यांना मनांत थारा मिळणार नाहीं असा प्रयत्न सदोदित करीत राहिले पाहिजे.
मनाला वळण लावावयाचें तें आपलें आपणच प्रयत्नपूर्वक लावावें लागतें. दुसरा कोणी त्यांत उपयोगी पडूं शकत नाहीं. आधीं विचार, मग निश्चय, नंतर क्रिया असा क्रम असतो. दुष्टवासनेचा परिणाम पापबुद्धींत होतो. प्रत्यक्ष कृतीला जितकीं बंधनें असतात तितकीं ती विचाराला नसल्यानें वाईट विचाराचे धोके आरंभीं तरी लक्षांत येत नाहींत. त्यामुळें वाईट विचारांची खंत वाटेनाशी होऊन पापाविषयीची बुद्धि बळावत जातें आणि ही बलवान् होऊ लागली कीं, मग वागण्यावरील बंधनेंहि ढिली होत जातात. आणि माणूस अनीति करूं लागतो. मनाला आवरणें फारसें हातांत नाहीं. पण शरीर आवरणें पुष्कळसें स्वाधीन असते. म्हणून समर्थ धर्म आणि नीति सोडू नको असा उपदेश मनाला करीत आहेत. मनांत येणार्या वाईट वासनांवर नियंत्रण ठेवणें हे फारसें तुझ्या हातांत नाहीं हें आम्हांस माहिती आहे. पण मनांत येणारे वाईट विचार क्रमाक्रमानें नाहींसे होऊन मन शुद्ध व्हावें असे तुला खरोखरींच वाटत असल्यास तुझें प्रत्यक्ष वागणें तरी निदान धर्माला व नीतीला सोडून घडणार नाहीं, अशी दक्षता घे, असे समर्थ म्हणत आहेत.
कबीरांचें एक वचन या दृष्टीनें विचारांत घेण्यासारखें आहे. कबीर म्हणतात– मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर । नहीं खींची कमान तो कहाँसे छूटेगा तीर ।।
एखाद्याचा घात करावा असा विचार मनांत येणें कितीहि वाईट असो प्रत्यक्ष घात-बाण जोडून धनुष्याची दोरी ओढली, बंदुकीचा घोडा दाबला म्हणजे होतो. तेवढे तरी निदान करूं नकोस. मनानें साधत नसेल तर शरीरानें तरी सदाचारांत रहावें. त्याचाहि क्रमानें लाभ होऊं शकतो. पूजा-संध्या-स्तोत्रें, कीर्तन, अन्नदान, तीर्थयात्रा या गोष्टी मनांत येतांच कराव्या. मनांत येत नसल्या, कंटाळा येत असला तरी कराव्या. जमतील, साधतील त्याप्रमाणें करीत राहून अधिकांत अधिक चांगल्या कशा होतील या दृष्टीनें प्रयत्न करावा. पण चांगल्या साधतील तरच करूं नाहीं तर नाहीं असें मात्र म्हणूं नये. मन चांगल्या गोष्टींत रमेल तर उत्तमच, पण तसें होत नाही म्हणून शरीर तरी चांगल्या गोष्टींतून बाहेर काढू नये. चांगल्या गोष्टींतच ठेवावें. कीर्तन-प्रवचनांत मन कधींच रमत नाहीं. म्हणून सर्वदा सिनेमाच पाहतो हें ठीक नाहीं. सिनेमाचे विचार मनांत येत असतील तरी कीर्तन प्रवचनाला वा मंदिरात मधून मधून आग्रहानें जाऊन बसणें हेंच श्रेयस्कर आहे. ``असो नसो भाव । जो हा देखे पंढरीराव'' असें संतानीं म्हटलें आहे तें यासाठींच. मनांत तितकी श्रद्धा नसली तरी पंढरपूरला जा. स्थानांचा कांहीं प्रभाव असतो. वस्तूचेंहि कांही मूल्य असतें. त्यामुळें प्रयत्नांना क्षेत्र उपलब्ध होतें.
धर्मानें आणि नीतीनें वागतांना आपली प्रकृति, प्रवृत्ति, परिस्थिति विचारांत घेतली पाहिजे. आदर्शाचीं शास्त्रवचनें शब्दश: विचारांत घेऊन चालणार नाहींत. यासाठींच समर्थांनी सार काय, महत्त्वाचें काय, गौण कोणतें, अपरिहार्यपणें आचरणांत आणलेंच पाहिजें असें काय आहे त्याचा विचार करावा, विवेक करावा असें सांगितलें आहे. माणसाचा स्वभाव मोठा विचित्र आहे. सार काय, असार काय, याचा विवेक जर केला नाहीं तर चांगल्या गोष्टींतहि विकृति निर्माण होते. संन्यासधर्म एरवीं फार कडक. कोणत्याही इंद्रियाचे लाड त्या आश्रमांत चालणार नाहींत. इंद्रियनिग्रह हाच तेथे नियम. पण विवेकानंदांनीं संन्याशाला कांहीं सवलती दिल्या आहेत. तंबाखू खाणें ही त्यातील एक सवलत. माणसाला कोठेंच कोणतीच सवलत दिली जात नाहीं तर तो सर्व बंधनें झुगारून देण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून कमी धोक्याच्या गोष्टींत सवलत द्यावी व अधिक धोक्याच्या गोष्टी कटाक्षानें टाळण्यास सांगाव्या असा विचार त्यांनी येथें सांगितला आहे. माझ्या माहितीचें एक उदाहरण सांगतों. एका दशग्रंथी कर्मठ ब्राह्मणाचा मुलगा लहानपणापासून अत्यंत कडक शिस्तींत, हें खाऊं नको, असें करूं नको, या बंधनांत वाढला. त्या बापड्याला कांदा-लसूण तर राहोच पण गाजर-वांगेंहि वर्ज्य होते. पुढें तो महाविद्यालयांत शिक्षणासाठीं शहरांत आला आणि इतका स्वैर वागूं लागला कीं कांदा-लसूणच काय पण मद्यमांसही त्याला वर्ज्य राहिलें नाही. सर्व समाजच्या-समाज नियमाच्या बंधनांत जेव्हां काटेकोरपणें पण सहजतेनें वागत असतो तेव्हा आपण स्वत: पाळत असलेले नियम जाचक वाटत नाहींत, नव्हे थोडे अधिक नियम पाळणेहि भूषणाचेंच वाटतें, पण कोणतेच नियम न पाळणारा समाज भोंवती असतांना फार कडक नियमांचा दुराग्रह धरणें, हे घसरगुंडीला लावण्यास कारणीभूत ठरणारें आहे. कांदा व मांस यामधें कांद्याची सवलत देणें इष्टच मानलें पाहिजे. आपल्याकडचे कांहीं कडक नियम मंत्रशक्तीच्या जपणुकीसाठीं होते. खाद्याखाद्य, स्पर्शास्पर्श हा त्यांतीलच एक भाग होता. गेल्या हजार-बाराशें वर्षांत तरी ब्राह्मणानें समाज म्हणून मंत्रशक्तीचा आधार शिल्लक ठेवला आहे असें दिसत नाहीं. त्यादृष्टीनें असलेले विधिनिषेध आज इतके कटाक्षानें पाळावेत की नाहीं याचा विचार केला पाहिजे. अधिक वाईट टाळण्यासाठीं कमी वाईटाचा विचार करणेंहि पुष्कळ वेळां इष्ट ठरते. ``नियमेंविण राहू नयें'' हें खरेंच पण त्यावेळीं `फार नियम करू नये' हेंहि लक्षात ठेवलेंच पाहिजे. चांगलें कितीहि चांगलें असलें तरी तें पचावें लागतें. त्याचें अजीर्ण होऊं देतां कामा नये. अधिक चांगल्याकडून कमी चांगल्याकडे येण्यापेक्षां कमी चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे जाणे जास्त चांगलें.
उद्योग-व्यवसायांत असलेल्या एका गृहस्थानें विष्णुसहस्त्रनामाचें १२ पाठ करण्याचें एकदां ठरविले. एका पाठाला ८ ते १० मिनिटें लागतात. दोन पावणेदोन तासाचा वेळ आपण सहज देऊं शकूं, असा त्याचा विचार, पण हें गणित प्रत्यक्ष व्यवहारांत उतरूं शकलें नाहीं. १२ पाठ पुरे न होण्याचा अनुभव आल्यामुळें त्याचें पाठ करणेंच सुटले. त्यानें एकच पाठ करावयाचें ठरविलें असतें तर त्याचा नियम कदाचित् पार पडला असता. आपली शारीरिक, मानसिक शक्ति किती? आपल्याला किती झेपेल याचा विचार करून नियम ठरवावे लागतात हेंच यांतलें सार होय. त्याचा विचार माणसानें केलाच पाहिजे.