गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ।।१।।
कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलाचरण करण्याचा शिष्टाचार आहे. मंगलाचरण करण्याच्या २-३ पद्धती आहेत. ग्रंथाच्या विषयाचें स्वरूप स्पष्ट करणें हेंहि एक प्रकारचें मंगलाचरणच मानलें जातें. इष्ट देवतेला नमस्कार करणें हे मंगलाचरणाचें स्वरूप अधिक लोकप्रिय असें आहे. समर्थ या ठिकाणीं पहिल्या ३ ओळींत नमस्काररूप मंगलाचरण करीत आहेत. तर चवथ्या ओळींत त्यांनी वस्तुनिर्देशरूप मंगलाचरण केलें आहे.
अंगीकृत कार्य निर्विघ्नपणे पार पडावें हा मंगलाचरणाचा हेतू आणि गणेश हा स्वभावत:च विघ्नहर्ता, त्यामुळें समर्थांनीं ग्रंथाच्या आरंभी गणपतीलाच वंदन करून मंगलाचरण केलें आहे. आपण श्रीगणेशाय नम: म्हणतो, कार्याचा श्रीगणेशा झाला म्हणतो. यावरून गणेशाचें माहात्म्य लक्षांत येतें. देवपूजेच्या वा प्रत्येक मंगलकार्याच्या आरंभीं गणपतिपूजन-निदान स्मरण तरी केले जातेंच. त्याच्या मागचें कारण भावनिक आहेच पण सांस्कृतिक आणि सामाजिकहि आहे. आज ज्या तात्त्विक कारणासाठी आपण चांगल्या अर्थानें लोकसत्तेचा उदो उदो करीत असतों त्याचें प्रतीक गणेशरूपांत आहे. हा देव गणपति आहे. गणांचा, समूहाचा, लोकांचा तो नेता आहे. रक्षणकर्ता आहे, शास्ताहि आहे. मात्र तो तांत्रिक पद्धतीनें केवळ निवडणूक जिंकल्यामुळें झालेला पुढारी नाही. तो गुणांचाहि ईश आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणीं समूहाच्या, समाजाच्या, लोकांच्या, गणांच्या नेतेपदीं आरूढ होण्यास योग्य ठरविणारे बुद्धिमत्ता, बहुश्रुतता, सूक्ष्मदृष्टि, उद्यमशीलता, क्षमाशीलता, दृढता, शौर्य, धैर्य, कर्तृत्व, सामर्थ्य, लोकसंग्रह, नि:स्वार्थता इत्यादि इत्यादि अनेक गुण व सद्गुण, उत्कृष्टरीतीनें आहेत, उत्कटतेनें आहेत. हे सद्गुण त्याच्याजवळ नम्र सेवकांप्रमाणें विनयानें राहतात, तो जणूं त्यांचा स्वामी आहे आणि म्हणून तो गणाधीश झालेला आहे. निर्गुणाची सगुणांत येण्याची इच्छा ज्याच्या रूपानें साकारली, तो जो आद्यप्रणव ॐकार हें गणेशाचेंच प्रतीक आहे. श्रीज्ञानेश्वरांनीं "अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडळ । मस्तकाकारें ।।" (ज्ञा. १।१९) असें म्हणून तें स्पष्ट केलें आहे. ॐकाराची आकृति आपण नेहमीं आडवी रेखाटतो. ती जर उभी रेखाटली तर एकदंत गजाननाच्या मुखाच्या आकृतीशीं तिचें सादृश्य अगदीं जवळिकेचें आहे हें सहज लक्षांत येईल. म्हणून समर्थ या गणेशरूपालाच निर्गुणाच्या आरंभिण्याच्या इच्छेचा मूळारंभ म्हणतात.
सृष्टीच्या सर्व भावांचे किंवा सृष्टीतील सर्व भावांचें तो मूलस्थानहि आहे आणि ईशहि आहे.
आपल्या पातळीवर चांगल्या-वाईटाचा, त्याज्य-ग्राह्याचा जणू याच्याशी संबंध नाहीं असें सुचविण्यासाठी समर्थ सर्वा गुणांचा म्हणतात. कारण मुळांत चांगलें व वाईट कांहीं नसतें. सृष्टींत, सगुणांत, आकारांत वस्तूंत जें कांहीं असतें ते मूलत: एकापेक्षां दुसरे फार तर वेगळें असते पण चांगलें किंवा वाईट नसतें. त्याचें चांगुलपण किंवा वाईटपण हें नंतरच्या उपयोगावर कोठें, किती, काय, कसें, कोणाला आणि कां या परस्परसंबंधांतून आकाराला येत असते. कामक्रोधहि नसून चालणार नाहींत आणि नुसत्या भावभक्तीनें व्यवहार निभणार नाहीत. गहूं- तांदळाप्रमाणेंच ईशसृष्टीत अफू-सोमलालाहि स्थान आहे. एरवी विष म्हणून त्याज्य असलेली अनेक द्रव्यें रोग नाहींसा करण्याच्या दृष्टीने प्रभावी असतात, म्हणून स्वयंपाकघरांत तिरस्कारार्ह असलेले विष वैद्याच्या हातांत औषध ठरतें. कोणाला केव्हां व कां याचा विचार करून वैद्य कसें, काय व किती ठरवितो, म्हणून विषहि अमृतासारखे कार्य करतें. निर्गुणाचा मुळारंभ म्हणण्यात वाईट- चांगले, त्याज्य-ग्राह्य याचें पलीकडे असलेल्या मूळतत्त्वाचा बोध आहे व त्याच रूपांत समर्थ गणेशाला वंदन करतात. आरंभाचा मुळारंभ म्हणण्यात केवळ शुद्ध तत्त्व हें सृष्ट्युन्मुख झालें आहे असेंहि सुचविलें जाते. नमस्कारासाठीं, भक्तीसाठीं, प्रगतीच्या ध्येयासाठीं, भावाच्या सगुण आलंबनासाठी तत्त्व या अवस्थेंतच असले पाहिजे.
समर्थ गणेशानंतर, विद्येची अधिष्ठात्री देवता म्हणून प्रसिद्ध असलेली जी शारदा, सरस्वती तिला वंदन करीत आहेत. ज्या नमू शब्दानें वंदन सुचविलें जातें तो नमू शब्द दोघांच्याहि, गणेशाच्या व शारदेच्याहि वंदनाचा वाचक आहे. उंबर्यावर ठेविलेला दिवा जसा दोन्ही खोल्यांना प्रकाशित करतो तोच देहली- दीप-न्याय येथेंहि आहे असें समजावें. आदिशक्ति, आदिमाया, शारदा जी परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी या चारी वाणीचें मूलस्थान आहे तिला येथें वंदन केलें आहे. वाणी, शब्द, ध्वनि ही स्पंदाची स्फुरणारी परिणत स्वरूपें आहेत. स्पंदाचा किंवा स्फुरणाचा तो पहिला परिणाम आहे असेंहि म्हणता येईल. जगताच्या आरंभी शब्द होता कारण तेंच ब्रह्माचें पहिलें स्फुरण होतें असें कांहीं शास्त्रकार मानतात. जगताच्या मुळाचा शोध घेण्यास प्रवृत्त झालेले विज्ञान कांहींजणांच्या मते तरी आद्यस्पंदापर्यंत जाऊन पोंचलें आहे. आपल्या वैदिक परंपरेंत वेदवाणी जगताच्या आरंभी प्रकट झाली अशी धारणा आहे.
ॐकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण: पुरा ।
कण्ठं भित्त्वा बहिर्यातौ तस्मान्मांगलिकावुभौ ।।
हें मतहि शब्दाच्या आद्यतेचेंच द्योतक आहे. स्पष्ट अशा वाणीची विभागणी संकल्प, भावना, विचार, शब्द अशा क्रमाने केल्यास ब्रह्माच्या "एकोऽहं बहुस्याम् प्रजायेय" या संकल्प-भावना-विचाराचाहि आद्यस्फुरणांत समावेश होऊं शकतो. शारदेला या सर्वांचें मूळ म्हणून समर्थ चिच्छक्ति, माया, आद्यप्रकृति या ब्रह्माच्या अभिन्न शक्तीचा बोध करीत आहेत.
मूलतत्त्वांना हा नमस्कार कशासाठी करावयाचा तर कार्य निर्विघ्नपणें पार पडावें यासाठीं. हें कार्य कोणतें? तर राघवाच्या अनंत मार्गाला लागण्याचें. सर्व मनाचे श्लोक माणसाला या मार्गाच्या प्रवासासाठीं प्रवृत्त करण्याकरितां, या मार्गाने चालणाराला प्रोत्साहन देण्याकरितां निर्माण झाले आहेत. हा मार्ग अनंत आहे. कधीहि न संपणारा आहे. आलों, पोचलों, असें वाटणें हा या मार्गावरचा अडथळा ठरतो. श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात– त्याप्रमाणें प्रत्यक्ष महेशहि, भगवान शंकरहि, या मार्गाचा अजून कापाडीच आहे. (ज्ञा. ६।१५३) वाट सुरूच आहे. प्रवासीच आहे. हा मार्ग कधीं संपत नाहीं. याचें कारण या मार्गाचें ध्येय, साध्य जें परब्रह्म तेंहि नि:सीम, अमर्याद, अनंत आहे. समर्थांचा राघव हा दशरथाचा पुत्र म्हणून ज्ञात असलेला ऐतिहासिक पुरुष नव्हे. हा राघव परमात्मारूप आहे. हें परब्रह्म आमच्याकरितां राघवाच्या, रामचंद्राच्या रूपाने प्रकट झाले इतकेंच. या राघवापर्यंत आपणास जाऊन पोचावयाचें आहे. मनाच्या श्लोकांनी सांगितलेला मार्ग त्याच्याकडे पोंचविणारा आहे. अशा अति अवघड कार्याला लागण्यापूर्वी सगुण साकार परब्रह्मरूप गणेश आणि चैतन्यासकट वाणीला, वैखरीला, प्रेरणा देणारी आदिशक्ति शारदा यांना विनयानें, प्रेमादरानें, भक्तिभावाने नमस्कार करून वा नमस्कार करा असें सांगून समर्थ जणूं साधकांसाठी त्यांचा आशीर्वाद मागत आहेत आणि मग म्हणत आहेत चला, आता कामाला लागू या. या अनंत असलेल्या राघवाच्या न संपणार्या मार्गास आपणास लागावयाचे आहे. चला–ती वाट धरूं या.
जिथे, ज्याकडे जावयाचें आहे तें समर्थांना जणूं प्रत्यक्ष समोर उभे आहे आणि म्हणून समर्थ समोर असलेल्या राघवाकडे बोट दाखवून म्हणत आहेत, या राघवाच्या मार्गाला लागू या.
पूर्ण ब्रह्मज्ञानी, ब्रह्मनिष्ठ असलेल्या समर्थांना त्यांचें दैवत सदासर्वदा प्रत्यक्षच आहे आणि म्हणून त्यांनीं "करी रे मना भक्ति या राघवाची ।" (म. श्लो. २६) "करी रे मना ध्यान या राघवाचें" (म. श्लो. ६६) "घनश्याम हा राम लावण्यरूपीं" (म. श्लो. ६७) "करी काम नि:काम या राघवाचें" (म. श्लो. ७७) "नभासारखें रूप या राघवाचे" (म. श्लो. १९७) असा आपल्या दैवताचा उल्लेख ते प्रत्यक्ष समोर असल्याप्रमाणें अनेकवेळां केला आहे. समर्थांसारख्या थोर सत्पुरुषांचें ऐकावयाचें तें यासाठींच. त्यांचें ज्ञान हें केवळ शब्दज्ञान नाहीं. तें पांडित्याचें प्रतीक नाहीं. तें साक्षात्काराला आलेल्या अनुभवातून उमटलेलें आहे. प्रत्यक्ष पुढें असलेल्या वस्तूचा बोध करणारें आहे.
मंगळाचरण झालें आतां प्रत्यक्ष उपदेश |